Wednesday, December 10, 2014

विण -
एकेका गोष्टीशी आपले धागे कसे जुळलेले असतात. काल माझी पुतणी मला विचारत होती, "काकू, लग्न झाल्यावर तुला तुझ्या आई बाबांची नाही का आठवण आली? असं कसं आज लग्नं करायचं आणि आपलं घर सोडून नवऱ्याच्या घराला आपलं म्हणायचं?". चौदा वर्षांच्या त्या अड्गुल्या छकुलीला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर बालपणापासून विणायल्या घातलेल्या त्या विणकामात आहे. दोन टाके सरळ दोन टाके आडवे मधेच गाठीचा टाका कधी विण चूकली म्हणून थोडी उसवण पण परत बरोबर टाके. अश्या विणलेल्या चादरीत किती टाके आजीचे, किती टाके आईचे आणिक किती वडलांचे, भावंडांचे, नातेवाईकांचे, आसपासच्या मंडळींचे, कोकणातल्या घराचे, सुट्टीतल्या दिवसांचे, पुस्तकांच्या वासाचे, नवीन कपड्यांच्या अप्रुपाचे, कमी पडलेल्या मार्कांचे, अनपेक्षित मिळालेल्या बक्षिसाचे, न ठरवून केलेल्या गमतीचे, ठरवून केलेल्या उठाठवीचे, श्रावणात वाटलेल्या मेंदीचे, दिवाळीतल्या गेरूचे, दहावी नंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचे, कॉलेजच्या पहिल्या दिवसाचे, अनोळखी ओळख घट्ट होण्याचे, चोरटी नजर झेलण्याचे, मान मोडून केलेल्या अभ्यासाचे, नोकरीच्या पहिल्या दिवसाचे, माहेरच्या पाठवणीचे, डोळ्यातल्या आठवणींचे, नवीन संसारातल्या ठेचा खाण्याचे, एकमेकांच्या चुका गोड मानण्याचे, मुलांच्या आगमनाचे, बाल संगोपानातल्या चुकांचे, लहान लहान आनंदाचे, दुख्खाचे, असीम सुखाचे, नवाच्या नवलाईचे; कितीतरी विणींची हि चादर अंगावर ओढली कि मग आयुष्य कसं उबदार आणि आश्वासक वाटायला लागतं. ही चादर विणून पूर्ण होत नाही, सोडलेले धागे नव्या टाक्यांची ओढ असते. हि "ओढ" आहे नं तीच त्या आठवणींना कुशीत घेते!
-रेवती ओक

No comments:

Post a Comment