Friday, October 19, 2012

"सती"




कोण म्हणतं सतीची प्रथा केव्हाच बंद झाली? सरणावर जळली नाही म्हणून का ती वाचली?
जिवंतपणी सुद्धा तिला चितेची धग जाणवते आहे ,रोजच्या आयुष्यात सुद्धा क्षणोक्षणी ती जळते आहे,
अग्निदिव्याचं प्राक्तन फक्त सितेच्याच कपाळी नाही,हजारो वर्षानंतरही स्त्री ह्यातून सुटलेली नाही,
सती म्हणा जोहार म्हणा ह्याला म्हणा त्यागही,निखार्यावरून चालणं काही तिला सुटलं नाही!
*******************************************************************************
गेले काही दिवस त्या लहानगीने माझं मन व्यापून टाकलं आहे. अवघ्या १४ वर्षांच्या  'मालाला' ने जो काही स्त्री शिक्षणाचा वसा उचलला आहे आणि त्यामुळे तिला ज्या यातनांतून जायला लागतं आहे ते बघून मन हेलावून  गेलं आहे. स्त्री शिक्षण काय,स्त्री भृणहत्या, स्त्रियांवरचे अत्याचार  काय हे एकाच दिशेचे वारे आहेत आणि ज्या कोणी त्या वाऱ्याची दिशा बदलू पाहतात त्यांना वनवास हा ठरलेलाच असतो का? आणखी किती दिवस हे चालू राहणार? समाजाच्या प्रत्येक स्तरात या न त्या प्रकाराने स्त्रीत्वाचा अपमान अवहेलना सुरूच आहे आणि शहाणे म्हणवणारे आपल्याला ते कळतच नाही असे भासवतो आणि मग "सती जाणे " म्हणतात ते हेच का असा प्रश्न मला पडतो! काही महिन्यांपूर्वी बरीच पुस्तक अशी वाचनात आली कि जणू काही एक वैचारिक मालिकाच! "थाउजंड स्पेल्नडीड सन्स","काबुल ब्युटी पार्लर","थ्री कप्स ऑफ टी","स्टोन्स टू द वॉल","अ कप ऑफ अनलाइकली स्टोरीज" आणि "एन्ड ऑफ manners" हि ती पुस्तकं. लेखक वेगळे, प्रत्येक कथानकाची बांधणी वेगळी पण आशय मात्र एकंच, "स्त्री आणि  तिच्या अस्तित्वाचा शोध!". जगाच्या एका टोकात स्त्रिया यशाच्या प्रत्येक शिखरावर आपला ठसा उमटवत असताना नकोश्या झालेल्या स्त्रियांच्या पदरी फक्त वैराणवाटच आहे. राजनीती काय म्हणते अथवा कोण चुकलं म्हणून हि परिस्थिती ओढवली हे मुद्दे सगळे सद्य परिस्थितीपुढे गौण आहेत. 'शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड' अशी काहीशी स्थिती स्त्रियांची ओढवली आहे. 
सं पाहिलं तर अत्याचारांना बळी पडणं हे बहुधा स्त्री असण्याचाच एक भाग आहे. आज सगळीकडे स्त्री भ्रूण हत्यांविषयी आवाज उठतो आहे, स्त्री आणि पुरुष ह्या  समाजातल्या प्रमाणाने धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे,उघड उघड मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर नको तो प्रसंग ओढवला जातो आहे आणि हे सगळं आपण ह्याच डोळ्यांनी पाहतो आहोत. मग अशी काही पुस्तकं वाचनात आली अथवा वर्तमान पत्र उघडल्यावर पहिल्या पानावर एखाद्या स्त्रीची यशोगाथा आणि त्याच खाली आणखी एका अत्याचाराची व्यथा वाचली कि काय खरं आणि काय खोटं हे कळेनासं होतं. खरं सांगू आपण सगळे मयसभेत उभे आहोत. आपल्या भोवती सगळं झगमगीत जग आहे त्यामुळे उंबरठ्या पलीकडे जे आहे ती वस्तुस्थिती बदलू शकत नाही.असं म्हटलं कि कोणी म्हणतात कि आपण काय करणार? पण आपणच करू शकतो ती गोष्ट आहे ते म्हणजे "स्त्रीत्वाचा आदर". तुम्ही ती नाकोशीची गोष्ट वाचलीच असेल, एखाद्या कुटुंबात जर बर्याच मुलींच्या नंतर परत मुलगीच झाली तर तिचं नाव नकोशी ठेवायची प्रथा भारतात खेड्यात प्रचलित आहे. हे लिहिताना सुद्धा अंगावर काटा येतोय माझ्या.सरकार दरबारी त्या नाकोशींची नावं बदलून दुखावलेली मनं तर बदलता येणार नाहीत. 
पल्या प्रगत समाजात अश्या घटना घडत नाहीत अशी आपली एक समजूत असते पण वस्तुस्थिती अशी आहे कि आपल्याला हि पडद्याआडची गोष्ट लक्षातच येत नाही. लग्नानंतर स्वप्नं घेऊन मुली इकडे येतात आणि प्रत्यक्षात मुलगा दुसर्याच मुलीच्या प्रेमात असतो.कुणी बायकोचा पासपोर्ट जप्त करतो तर कुणी ऑफिसला जाताना तिला खोलीत बंद करून जातो.शेजाऱ्यांशी संपर्क ठेवायला मनाई करणारे तर माझ्याही ओळखीत आहेत.क्वचित एखादी बाहेर पडलीच तर तिला ज्या यातना भोगाव्या लागतात त्या ओठावर न येवू द्यायची काळजी घ्यायला तो विसरत नाही. ह्या अश्या विचित्र वाटणाऱ्या घटनांबद्दल आपण आडून आडून बोलतो पण गरज आहे ती त्या "तिला" मदत करण्याची,नाहीतर जगात अश्या नकोश्या परत परत "सती" जातच राहणार.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment