Saturday, March 2, 2013

"निर्भया"

नवीन अर्थ-धोरणात "निर्भया निधी" चा उल्लेख वाचून मन विचारात पडलं कि नक्की काय करतील ह्या निधीचं?स्त्री सबलता आणि स्व-जागरूकता ह्याच्या साठी ह्या निधीचा उपयोग होईल का? फक्त बलात्कार झाल्यावारच तो अत्याचार आणि रोज घडतं ते काय? साधं बस मधून जाताना सुद्धा अनेक नजरा झेलाव्या लागतात,स्पर्श टाळायचा संघर्ष करावा लागतो, भाजी घेताना देणारा पैसे नक्की बाईच्याच हातात देतो किंवा एखाद्या खूप ओळखीच्या आदराच्या पुरुषाच्या नजरेची एखादीच तिरीप अंगावर शिसारी आणते ह्या सगळ्याला शब्दकोशात काय नाव आहे? आम्ही कोकणात जायचो ती एसटी बस रात्रीची आणि प्रवास चांगला १०-११ तासाचा. आजी संध्याकाळ पासूनच मला आणि ताईला सांगायची पाणी कमी प्या म्हणजे बाहेर बाथरुमला जायला लागायचं नाही. ह्यात तिला आम्हाला रात्री न्यायला लागेल हि चिंता नव्हती तर बाहेर उघड्यावर आपल्या नातींना न्यावं लागेल ह्याची लाजिरवाणी खंत होती. बरं हि गोष्ट झाली २५ वर्षांपूर्वीची, तेव्हड्यात जग इकडचं तिकडे झालं आहे पण स्थिती अजूनही तशीच आहे अगदी ७-८ महिन्यांपूर्वी शिर्डीहून येताना मला खरंच श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ कळाला. पुण्यात घरी येई पर्यंत माझी अवस्था दयनीय झाली होती, तेव्हा आजी आठवली! स्त्रियांना अपेक्षित बदल फार कमी आहेत कारण मुळातच स्त्री आणि पुरुष ह्यांच्यात एक फरक आहे तो सामंजस्याचा त्यामुळे स्त्रियांना आरक्षण देवून त्यांच्यासाठी वेगळी बँक काढून हि सार्वजनिक अनास्था संपणारी नाही. मुळातच सध्या आपल्याकडे बदल होतो तो फक्त उच्चस्तरीय म्हणजे एकदम वरची चादर बदलून कोच चकचकीत पण बसायला गेलं कि आतल्या स्प्रिंगा टोचतात तश्यातला प्रकार आहे. कुठलाही सामाजिक बदल जसा समाजाला सामावून घेतल्याशिवाय होत नाही तसंच स्त्रियांच्या बाबतीत घडणारे हे प्रसंग सुद्धा मुद्धेसूदरित्या तळागाळापासून समजावून दिले पहिजेत. माझ्याकडे काम करणाऱ्या मावशींची नात सुमा एकदिवस शाळेतून लवकर घरी आली आणि ती थेट आमच्याकडेच कारण मावशी त्यावेळेला इथेच असत. सुमाकडे बघतच लक्षात आलं कि सुमा "मोठी" झाली आहे. तिच्या नजरेतलं कुतूहल, भीती अगदी स्पष्ट दिसत होतं पण मावशींनी तिला जे काही फैलावर ह्यायला सुरुवात केली कि मला सुन्न व्हायला झालं. निसर्गाची ही किमया प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा भाग असते आणि हे जीवचक्र त्यावर तर अवलंबून असतं हे एका स्त्रीला कळू नये आणि त्याचा किती तो गहजब? फार पूर्वी हेच चार दिवस त्या बाईसाठी हक्काच्या विश्रांतीसाठी असायचे पण आता काळ बदलला आहे तरीही अनेकांच्या कडे अजूनही त्या चार दिवसांत घरातल्या मुलींना, बायकांना कशी वागणूक असते? हे बदलायला नको का? आज २०१३ साली आपण हीच चर्चा करतो आहोत जी चर्चा १२५ वर्षांपूर्वी सुधारक समाजवादी करत होते. ह्यावरून सिद्ध होतं कि सुधारणा अजूनही बाकी आहे. आपलं काम हे आहे कि हि बाकी लवकरात लवकर भरून काढायची आणि खरंखुरं मजबूत पाऊल पुढे टाकायचं मग त्यासाठी हा "निर्भया निधी" वापरायचा कि आपली ताकद हे ज्या त्या स्त्रीने ठरवावं.पण प्रत्येक स्त्री जर साक्षर झाली आणि तिने "स्वतःला" स्वीकारलं तर कोचच्या स्प्रिंग टोचणार नाहीत उलटपक्षी समाजाचं बस्तान मजबूत होईल. जो पर्यंत आपण किती महत्वाचे आहोत हे समोरच्याला कळत नाही तोपर्यंत बदल होणार नाही. पुरुष मोठा आणि बाई लहान असं कुठल्याही ग्रंथाने सांगितलं नहिये. मला नक्की माहिती आहे जो आवाज चढवतो तो शिरजोर होतो त्यामुळे आपल्याला जर का बदल हवे असतील तर त्यासाठीचं मंथन आपल्यालाच केलं पहिजे. एकतरी नेता असा आहे का कि ज्याने स्त्रियांच्या सार्वजनिक स्वछतागृहांचा प्रश्न तडीस नेला आहे? मुळातच ह्याला प्रश्न म्हणावं लागतंय ह्यातच ह्या अनास्थेचं उत्तर आहे. मी परत परत ह्याच मुद्द्याकडे येते आहे कारण मला स्त्रियांना प्रवासात उघड्यावर अथवा गैरसोयीच्या ठिकाणी जावं लागणं हे एखाद्या शारीरिक अत्याचाराच्याच बरोबरीचं वाटतं. तुम्हाला काय वाटतं बदलेल हे चित्र?





2 comments:

  1. "जो पर्यंत आपण किती महत्वाचे आहोत हे समोरच्याला कळात नाही तोपर्यंत बदल होणार नाही" .....Lajawaab!!!!!

    ReplyDelete