Saturday, November 10, 2012

दोन पावलं अंतर-

तळ्याकाठचा वारा हसतो दूर असूनही खुणावतो, 
श्वासा श्वासा मध्ये माझ्या त्याचा पिंगा रुणझुणतो;
त्या वाऱ्याचा ध्यास वेगळा खिन्न मनाला जागवतो, 

स्पर्शानेही नुसत्या त्याच्या अंतर्नादही गुणगुणतो;
मैत्रीचा आश्वासक गंध जवळ असूनही दुरावतो, 

माझ्या हातामधून नुसता काळ वाळूचा पुढे सरतो;
तुमचा आठव तुमचा वावर एकसारखा
जाणवतो , 
मैतर माझे पैल किनारी  ऐल किनारा मुसमुसतो!

योग्य वेळेला योग्य ठिकाणी असलेल्यांचा मला खरंच  हेवा वाटतो! नाहीतर मी, चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी असते. गेल्या १४ वर्षात जरा कुठे बस्तान बसतं आहे आणि आता काहीतरी मनाजोगतं करता येईल असं वाटतं  आहे  तोच दिशा बदलते आणि प्रवास नव्याने सुरु होतो. त्या पालीच्या गणितासारखं आहे, चार पावलं पुढे आणि दोन पावलं मागे. ह्या हिशोबाने जेमतेमच पावलं  पुढे टाकली म्हणायची मी. आज हे लिहिताना मी अगदी एकटी आहे, चार आठवड्यापूर्वी चहुबाजूला असलेल्या माणसांतून आज अचानक आजूबाजूला कोणीच नाही. नवीन ओळखी करणं काही कठीण नाही पण हल्ली जरा अवघड जातं. समोरचा आणि आपण ह्यातला समान दुवा शोधून ती मैत्री वाढवणं कि कला आहे आणि मला इतके दिवस वाटत होतं कि आपल्याला हे अगदी लीलया जमतं पण बदलत्या काळात हे समान दुवे सापडतच नाहीत. ६वर्षांपूर्वी शिकागोला मला भेटलेले सगळे त्यानंतर शार्लटचे माझे मैत्र मला इकडे सापडणार नाहीत हे नक्की तरीही मला परत एकदा जोमाने प्रयत्न करून नवीन ओळखी वाढवायला हव्यात कारण गरज त्यांना नाही मला आहे. एक जाणवलेली गोष्ट म्हणजे वास्तव आणि मी ह्यात नेहेमीच दोन पावलं अंतर राहिलं आहे. आजूबाजूच्यांना समजून घेताना ते टेकडी चढूनही जातात आणि मी मात्र पायथ्याशी स्वतःच्या कमकुवत पावलांकडे बघत असते. कदाचित विधात्याला आता हे मान्य नसावं म्हणून मला अशा एकांतात आणलं आहे कि माझ्या कमकुवत पावलांना ते दोन पावलं अंतर भरून काढायला शिकवायचं आहे!
 

Saturday, October 27, 2012

“व्हॉट आर यु गा‌इज अप टू इन शिकागो?”

      असा सवाल व्हीसा ऑफिसरने मला केला आणि काय उत्तर दे‌ऊ असा प्रश्न पडला, कारण माझं शिकागोचं ज्ञान भूगोलाच्या पुस्तकातला कत्तलखाना, आणि सी‌अर्स टॉवर ह्याच्या पलीकडे नव्हतं. माझा गोंधळलेला चेहेरा पाहून त्याने हसून एक सल्ला दिला, मुली, निव्वळ दिलखुलासपणे शिकागो फिर, शिकागो कधीच कुणाला निराश करत नाही. हे वाक्य माझ्या मनात इतकं खोलवर कोरलं गेलं कि, ओहेर विमानतळावर पोचल्याक्षणीच माझ्या मनाने पसंतीचा कौल दिला. तिथून सुरु झालेला हा शिकागोनुभव आपणा सर्वांनाही मिळावा, ह्यासाठी हा लेखप्रपंच.
      पण तत्पूर्वी जाणून घे‌ऊ जरा ह्या शहराच्या पूर्व इतिहासाबद्दल. नावात काय आहे म्हणताना नावातच गावाचं गुपित असतं हेच सत्य आहे, म्हणूनच शिकागोनदीच्या काठी पिकणाऱ्या कांद्याच्या मूळ फ्रेंच shikaakwa (Stinky Onion) नावावरून शिकागो हे नाव जन्माला आले. सागरासमान भासणाऱ्या मिशिगन लेक च्या काठावर वसलेले हे गाव सुमारे १७७० सालच्या आसपास वसाहतींना आकृष्ट करू लागले. ४ ऑगस्ट १८३० रोजी शिकागो महानगर पालिकेची स्थापना झाली. ह्याच दरम्यान यांकी वसाहतगारांनी शिकागोची भौगोलिकता जाणून घे‌ऊन आजूबाजूच्या भागांना जोडता येणारे रस्ते बांधून व्यापार-उदीमाचे नवे क्षेत्र म्हणून शिकागो नावारूपाला आणले. इलिनॉय-मिशिगन कनालगलेना-इलिनॉय रेल्वे ह्यांची स्थापना १८४८ साली हो‌ऊन शिकागोची औद्योगिक घोडदौड इतकी वाढली कि १८७० पर्यंत शिकागो शहराची गणना जगातील इतर मोठ्या शहरांत हो‌ऊ लागली, पण १८७१ साली अशी एक हृदयद्रावक घटना घडली कि ज्यामुळे शिकागो च्या पत्रिकेतील सगळे ग्रह उलटे सुलटे झाले. ती घटना म्हणजे दि ग्रेट फायर ऑफ शिकागो. संपूर्ण भस्मसात झालेल्या ह्या शहराने जन्म दिला एका नव्या दिमाखदार शिकागोला, आणि गगनाला हात टेकणाऱ्या स्कायस्क्रेपर इमारतींना. अमेरिकेच्या वास्तुशिल्पविद्येत आमूलाग्र बदल करून, न्यूयॉर्क शहराशी टक्कर देत शिकागो शहर पुन्हा एकदा उन्नतीच्या प्रवासाकडे वाटचाल करू लागले. ३ मिलियन एवढी लोकसंख्या असलेल्या ह्या शहराला नेहमीच सेकण्ड सिटी असं संबोधलं गेलं आहे, पण तरीही माझ्यासारख्या प्रत्येक शिकागोप्रेमी माणसाच्या हृदयात शिकागोचं स्थान अढळ आहे. एका नजरेत मनाला भिडणारा शिकागोचा आवेग मला तर प्रेमानुभूती दे‌ऊन जातो. प्रत्येक वेळी नवीन भासणारा मिशिगन लेकचा किनारा, वेगवेगळ्या ठिकाणांहून अनुभवायला हवाच. वाऱ्याच्या वेगाने downtown च्या ओघवत्या प्रवाहात स्वतःला झोकून दे‌ऊन तर बघा!
      कला आणि कल्पकता ह्यांचा मिलाफ आपल्याला जागोजागी दिसून येतो. Art institute, Museum of contemporary art आणि नवीनच साकारलेले The Bean हे शिल्प म्हणजे ह्याची उत्तम उदाहरणे आहेत. वास्तुशिल्पातला चमत्कार म्हणजेच Willis Tower (पूर्वीचा Sears) त्याच थाटात शिकागोला सलाम ठोकत उभा आहे. मी तर Willis Tower आणि John Hancock इमारतींना शिकागोचे भालदार चोपदार म्हणते. उत्कृष्ट वास्तुशिल्पकला अनुभवायची असेल तर शिकागो रिव्हर मधून बोटीची सफर घेता येते. ह्या तासाभराच्या सफरीत इतिहासाची कितीतरी पाने उलटून पाहता येतात. इतिहासावरून आठवलं कि, ज्यांचा इतिहास मोठा कठीण आणि काळा असतो त्यांना तो पुसून स्वतःचं भविष्य नव्यानं लिहिताना वेदना होतातच. अगदी तसंच काहीसं शिकागोबाबत झालं. माफिया, गुंडगिरी आणि भ्रष्टाचार ह्यांनी पोखरलेल्या अवस्थेतूनजगातील काही मोठ्या आणि यशस्वी शहरांच्यात नाव घेता येण्याजोग्या उत्तम स्थितीपर्यंतचा खडतर प्रवास शिकागोने केला आहे. त्यात अनेकविध लेखक, कलाकार, तंत्रविशारद, संगीतकार, राजकारणी लोकांचा समावेश आहे. शहराची बांधणी ही नुसती एककल्ली न होता अतिशय खुल्या अशा मनोवृत्तीचं दर्शन इथे होतं. मला सगळ्यात प्रिय असणारी जागा म्हणजे Grant Park. तिथलं Millennium Park, Buckingham Fountain प्रत्येक वेळा नवीन अनुभव दे‌ऊन जातात. अध्यक्ष बराक ओबामा ह्यांचा अमेरिकेच्या राजकारणाचा नवा अध्याय Grant Park च्या प्रांगणातच सुरू झाला. शिकागोबद्दल बोलताना Cubs, White Sox, Blackhawks, Bulls, Bears ह्यांना विसरून कसं चालेल? शिकागोची शान म्हणजे नेव्ही पि‌अर. तिथे वाऱ्याशी गप्पा मारत १५ मजली उंच फेरीस व्हील मध्ये बसल्यावर जेव्हा सगळं शिकागो शहर आपल्या समोर दिसतं नं, तेव्हा ह्याच साठी केला होता अट्टाहास ह्या ओळी खऱ्या वाटू लागतात!
      (लेखासाठीचे संदर्भ: विकिपीडिया आणि नॅशनल जि‌ओग्राफिक ट्रॅव्हलरचा सप्टेंबरचा2010 अंक)




"कढी"

दोन वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाचं पंधरावं अधिवेशन शिकागोला करायचं ठरलं तेव्हा मी शिकागो रहिवासी होते आणि मुळातच उत्साही असल्यामुळे अधिवेशनाच्या तयारीत माझाही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न म्हणून मी लेखणी सरसावायची ठरवली. विविध विषयांच्या माध्यमातून मी अधिवेशानाचे आवाहन BMM Vruttaतून करीत असे. वास्तविक प्रासंगिक वाटणारे लेख माझ्या कल्पनेपेक्षाही लोकप्रिय ठरले. "बकुळफुले" वर ते लेख तसेच सदर करणे म्हणजे कदाचित शिळ्या कढीला उत आणण्यासारखे वाटेलही पण परत चुरचुरीत फोडणी दिलेली कढी जास्त आस्वादक लागते हेही खरंच आहे. मी काही निवडक लेख थोडे बदलून तुमच्या वाचनासाठी इथे पोस्ट करत आहे, बघा ह्या कढीची चव तुम्हाला कशी वाटते ते!

Friday, October 19, 2012

"सती"




कोण म्हणतं सतीची प्रथा केव्हाच बंद झाली? सरणावर जळली नाही म्हणून का ती वाचली?
जिवंतपणी सुद्धा तिला चितेची धग जाणवते आहे ,रोजच्या आयुष्यात सुद्धा क्षणोक्षणी ती जळते आहे,
अग्निदिव्याचं प्राक्तन फक्त सितेच्याच कपाळी नाही,हजारो वर्षानंतरही स्त्री ह्यातून सुटलेली नाही,
सती म्हणा जोहार म्हणा ह्याला म्हणा त्यागही,निखार्यावरून चालणं काही तिला सुटलं नाही!
*******************************************************************************
गेले काही दिवस त्या लहानगीने माझं मन व्यापून टाकलं आहे. अवघ्या १४ वर्षांच्या  'मालाला' ने जो काही स्त्री शिक्षणाचा वसा उचलला आहे आणि त्यामुळे तिला ज्या यातनांतून जायला लागतं आहे ते बघून मन हेलावून  गेलं आहे. स्त्री शिक्षण काय,स्त्री भृणहत्या, स्त्रियांवरचे अत्याचार  काय हे एकाच दिशेचे वारे आहेत आणि ज्या कोणी त्या वाऱ्याची दिशा बदलू पाहतात त्यांना वनवास हा ठरलेलाच असतो का? आणखी किती दिवस हे चालू राहणार? समाजाच्या प्रत्येक स्तरात या न त्या प्रकाराने स्त्रीत्वाचा अपमान अवहेलना सुरूच आहे आणि शहाणे म्हणवणारे आपल्याला ते कळतच नाही असे भासवतो आणि मग "सती जाणे " म्हणतात ते हेच का असा प्रश्न मला पडतो! काही महिन्यांपूर्वी बरीच पुस्तक अशी वाचनात आली कि जणू काही एक वैचारिक मालिकाच! "थाउजंड स्पेल्नडीड सन्स","काबुल ब्युटी पार्लर","थ्री कप्स ऑफ टी","स्टोन्स टू द वॉल","अ कप ऑफ अनलाइकली स्टोरीज" आणि "एन्ड ऑफ manners" हि ती पुस्तकं. लेखक वेगळे, प्रत्येक कथानकाची बांधणी वेगळी पण आशय मात्र एकंच, "स्त्री आणि  तिच्या अस्तित्वाचा शोध!". जगाच्या एका टोकात स्त्रिया यशाच्या प्रत्येक शिखरावर आपला ठसा उमटवत असताना नकोश्या झालेल्या स्त्रियांच्या पदरी फक्त वैराणवाटच आहे. राजनीती काय म्हणते अथवा कोण चुकलं म्हणून हि परिस्थिती ओढवली हे मुद्दे सगळे सद्य परिस्थितीपुढे गौण आहेत. 'शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड' अशी काहीशी स्थिती स्त्रियांची ओढवली आहे. 
सं पाहिलं तर अत्याचारांना बळी पडणं हे बहुधा स्त्री असण्याचाच एक भाग आहे. आज सगळीकडे स्त्री भ्रूण हत्यांविषयी आवाज उठतो आहे, स्त्री आणि पुरुष ह्या  समाजातल्या प्रमाणाने धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे,उघड उघड मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर नको तो प्रसंग ओढवला जातो आहे आणि हे सगळं आपण ह्याच डोळ्यांनी पाहतो आहोत. मग अशी काही पुस्तकं वाचनात आली अथवा वर्तमान पत्र उघडल्यावर पहिल्या पानावर एखाद्या स्त्रीची यशोगाथा आणि त्याच खाली आणखी एका अत्याचाराची व्यथा वाचली कि काय खरं आणि काय खोटं हे कळेनासं होतं. खरं सांगू आपण सगळे मयसभेत उभे आहोत. आपल्या भोवती सगळं झगमगीत जग आहे त्यामुळे उंबरठ्या पलीकडे जे आहे ती वस्तुस्थिती बदलू शकत नाही.असं म्हटलं कि कोणी म्हणतात कि आपण काय करणार? पण आपणच करू शकतो ती गोष्ट आहे ते म्हणजे "स्त्रीत्वाचा आदर". तुम्ही ती नाकोशीची गोष्ट वाचलीच असेल, एखाद्या कुटुंबात जर बर्याच मुलींच्या नंतर परत मुलगीच झाली तर तिचं नाव नकोशी ठेवायची प्रथा भारतात खेड्यात प्रचलित आहे. हे लिहिताना सुद्धा अंगावर काटा येतोय माझ्या.सरकार दरबारी त्या नाकोशींची नावं बदलून दुखावलेली मनं तर बदलता येणार नाहीत. 
पल्या प्रगत समाजात अश्या घटना घडत नाहीत अशी आपली एक समजूत असते पण वस्तुस्थिती अशी आहे कि आपल्याला हि पडद्याआडची गोष्ट लक्षातच येत नाही. लग्नानंतर स्वप्नं घेऊन मुली इकडे येतात आणि प्रत्यक्षात मुलगा दुसर्याच मुलीच्या प्रेमात असतो.कुणी बायकोचा पासपोर्ट जप्त करतो तर कुणी ऑफिसला जाताना तिला खोलीत बंद करून जातो.शेजाऱ्यांशी संपर्क ठेवायला मनाई करणारे तर माझ्याही ओळखीत आहेत.क्वचित एखादी बाहेर पडलीच तर तिला ज्या यातना भोगाव्या लागतात त्या ओठावर न येवू द्यायची काळजी घ्यायला तो विसरत नाही. ह्या अश्या विचित्र वाटणाऱ्या घटनांबद्दल आपण आडून आडून बोलतो पण गरज आहे ती त्या "तिला" मदत करण्याची,नाहीतर जगात अश्या नकोश्या परत परत "सती" जातच राहणार.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, October 16, 2012

गप्पा

कशी कुठे जुळली असते प्रत्येकाची नाळ, जसे असते नावापुढे ओळखीचे गाव;
विसरून जाते अस्तित्वाची खरीखुरी गोष्ट, पावलांनाही होते अनोळखी वाट;
हातावरच्या रेषा सुद्धा पुसट होत जातात, नवीन नाती शोधत नवी वळणे घेतात;
कधीतरी मग एक असे वळण येते, मन एक सांगत असते तरी पा‌ऊल तिथेच थांबते;
काय आहे तिथे असं थबकण्याजोगं, धूसर दिसून सुद्धा वाटतं काहीतरी नवं!

      मला गप्पा मारायला खूप आवडतं आणि माझी खात्री आहे तुम्हाला सुद्धा माझ्याशी गप्पा मारायला आवडेल. ह्या शिळोप्याच्या गप्पांमधून जसं मला स्वतःला शोधता आलं तसंच बघा तुम्हाला सुद्धा शोधता येतं का ते! काय आहे की इतक्या वर्षांत जे मनात होतं ते कागदावर उतरवता आलं, म्हणजे जे वाटलं ते बोलले, मनापासून गोष्टी शे‌अर केल्या, अगदी जे आठवलं ते सांगितलं. वर म्हटल्याप्रमाणे आपण आयुष्यात पुढे जाताना मागचं सगळं सपाट करत जातो पण तरीही अशा गप्पांमधून, शे‌अरिंग मधून परत एकदा पुसून गेलेलं मनात उमटतं, आणि मनावरची धूळ पुसून काढावीशी वाटते. आपण सगळेच आपला देश सोडून स्वेच्छेने सातासमुद्रापार आलो, इथली जीवनशैली स्वीकारली, भाषा जवळची केली तरीही आत खोलवर जी मुळं आहेत ती परत परत रुजतात आणि अशा गप्पांमधून वाढीला लागतात. मला आठवतं माझे एक आजोबा त्यांच्या आयुष्याच्या चाळिशीत ठाण्यात स्थायिक झाले, ते अगदी ९० वर्षांचे हो‌ईपर्यंत, पण ओळख सांगताना ते "हल्ली ठाण्यात असतो पण मूळचे आम्ही कर्ल्याचे, रत्नागिरीचे", अशी ओळख सांगायचे. आपण सुद्धा नाही का, आडनावाबरोबर त्याला एक मूळगाव चिकटवतो? वास्तविक निम्मी माणसं त्या गावाच्या वाटेला गेलेली देखील नसतात, परंतु न बघता सुद्धा त्यांना अप्रत्यक्षरीत्या ह्या अशा शिळोप्याच्या गोष्टी त्या वाटेवर ने‌ऊन आणतात. काय झालंय, ह्या नव्या जमान्यात तांत्रिक दृष्ट्या आपण इतके जवळ आलोत की प्रत्यक्ष बोलण्यातील मज्जाच हरवून बसलो आहोत. माझे आजोबा, अण्णा रोज आम्हाला त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगायचे आणि इतक्या रंगवून सांगायचे की ज्याचं नाव ते! अशाच गोष्टींत एक गोष्ट असायची ती वेगवेगळ्या पदार्थांची. केळीच्या पानात भाजलेले कंद, पाणचुलीत भाजल्या जाणाऱ्या आंब्याच्या को‌ई, मोहरीचा सणसणीत खार असणारे उकड‌आंबे आणि अशाच कितीतरी. हे सगळं आठवताना वाटतं, की आपल्या पिढीपर्यंत ह्या गप्पा, आठवणी समजण्यासारख्या असतील पण पुढे काय? आपण जेव्हा अशा वयात ये‌ऊ तेव्हा हे संदर्भ आपल्या पुढच्या पिढीला किती असंबद्ध वाटतील नाही का? अहो पण हे चुकीचं आहे, फक्त हजारो मैल दूर आलो म्हणून काय झालं, शेवटी जिथे आपल्या पिढ्यान पिढ्या वाढल्या, घडल्या त्या जगाची ओळख नवीन रक्ताला नको का? कितीही पाठ फिरवली तरी सत्य काही बदलता येत नाही, अगदी कायद्यानुसार बाहेरचे नागरिक झालेले तुम्ही जिथून आलात त्याची बांधिलकी सोडू म्हटली तरी सोडत नाही. नाटक, सिनेमे, गाणी, अगदी स्वतःला अद्ययावत ठेवता पण मुलांना किती पोचवता? नाही नाही माझं असं अजिबात म्हणणं नाही की मराठीत Ph.D. करा पण निदान पाठ तरी फिरवू नका. त्यांना तुमच्या साठी तरी आपली भाषा शिकवा. तुम्ही आम्ही जी गम्मत आपल्या आजोळी, गावी, शहरात केली त्याचा आस्वाद घ्यायला त्यांना शिकवा. बरेच वेळा पाहण्यात आलं आहे, की १२-१३ वर्षांची हो‌ईपर्यंत बरं मराठी बोलतात पण नंतर मात्र खडखडाट! मग उगीच आपण म्हणणार त्याला कळतं सगळं पण नीट बोलता येत नाही, म्हटलं ही मुलांच्या विरुद्ध तक्रार नाही तुमच्या बद्दल आहे. सवय लावलीत तर गोडी निर्माण हो‌ईल, समभाषिक वातावरणात त्यांना सहज व्यक्त होता ये‌ईल, नाहीतर आहेच मग ना इकडचे ना तिकडचे! माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीचा मुलगा भारतात आज्जीला भेटायला गेला, आजीला वाटलं नातू येतोय इतक्या वर्षांनी तर कुठे ठेवू नि कुठे नको, पण ह्याला हो-नाही शिवाय मराठी बोलायची सवय नाही, कळत होतं सगळं पण बिचारी आजी त्याच्या हो नाही वरच समाधान मानती झाली. आणखी एक लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलांना आपल्या संस्कृती बद्दल कुतूहल आहे, आज जगभर भारतीय बुद्धिवंतांचा गवगवा आहे, योगाच्या माध्यमातून, पर्यटनातून भारत अधिकाधिक मुलांच्या मनात प्रगल्भ होतो आहे, तर त्यांची ही जिज्ञासा थोपवू नका, त्यांना आपल्या देशाची ओळख नव्याने करून द्या. पुढल्या भारताच्या दौऱ्यात जरा कोकणात जा, लाल मातीत पाय रंगवा, तिकडे विदर्भ मराठवाड्यात sunscreen शिवाय जा, बघा तुमच्या आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी ये‌ईल. अरे आपण तर गप्पात हरवूनच गेलो! बघा अश्या गप्पा रंगायला काही ओळखच हवी असं नाही आणि बोलता बोलता हळू हळू होईलच कि परिचय. बरं आत्ता येते पण परत माझ्या कट्ट्यावर यायला विसरू नका अजून बरंच काही बोलायचं आहे!