Wednesday, December 10, 2014

गटारी-
"गटारी" या शब्दाशी माझं नातं जुनं आहे. दचकू नका पण, शाळेच्या कार्डावर पत्ता "वरळी गटाराजवळ" असा असल्यामुळे ते नातं अधिक घट्ट आहे! यंदा आषाढ सुरु झाला तो उन्हाच्या झळा सोसतच, आता कुठे आषाढ संपताना मेघ बरसू लागले आहेत. पाऊस उशिरा आला तरीही तारखे मागून तारीख येतेच आणी त्याबरोबर महिनेही. तसं प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणी अमावास्या ह्या यायच्याच हा सृष्टीचा नियमच आहे. माणसाने यात गम्मत आणण्याकरिता तर कधी काही बदल म्हणून तर कधी प्रकृतीमानासाठी सणवार आणी दिनमहात्म्य निर्माण केलं. एक काळ होता कि ह्या सगळ्या सणवारात एक अपूर्वाई होती, कांद्याची भजी कांदेनवमीला करायची, मोदक गणपतीतच व्हायचे, पाकातल्या पुऱ्या गौरीसाठी आणी चकल्या कडबोळी तर फक्त दिवाळीत किंवा लग्नघरी. प्रत्येक गोष्ट कशी सिझनल होती. त्यामुळे आपसूकच जीवनाला एक नियमितता होती. मला आठवत आहे तेव्हापासून श्रावण सोमवारी अर्धा दिवस शाळा आणी चार वाजता जेवण. मग रमत गमत शंकराला जायचं आणी मसाला दुध पिऊन घरी यायचं. आमच्याकडे काहीही चैनीच्या वस्तू नव्हत्या आणी त्याच्या बद्दल काहीही विशेष जाणीवही नव्हती तरीही आम्ही खूप समाधानी होतो. आज परिस्थिती काय आहे? सभोवताली हे सिझनल असणं विरून चाललं आहे, शिल्लक आहे ते फक्त सेलिब्रेशन पुरतं. उद्या गटारी, बाकी काही लक्षात नसेल पण उद्या खच्चून दारू प्यायची आणी नॉनव्हेज खायचं एव्हडच लक्षात आहे. बिर्याणीवाल्यांकडे महिना महिना आधी बुकींग करून झालं आहे, लिकर शॉप समोर मुंगीलाहि जागा मिळणार नाही अशी गर्दी आहे. हे सगळं कशासाठी? तर "गटारी गटारीचा" दिवस पाळण्यासाठी! गैरसमज करू नका, मला दारूचं वावडं नाही, एखादा ग्लास वाईन किंवा बिअर काहीच गैर नाही पण केवळ आपण त्या ग्रुपमध्ये सामावले जाऊ म्हणून न झेपण्य़ाएव्हढी दारू ढोसायची आणी हसं करून घायचं यात कसला आलाय मोठेपणा? मोठेपणा असेल तर तो यातच आहे कि समोरच्याच्या डोळ्यात भरण्यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत उतरत नाही नं याची खबरदारी घेणं आणी जे हि खबरदारी घेतात त्यांनी स्वतःच्या पाठीवर एक शाबासकी नक्की द्यावी! मध्यंतरी एका हॉटेलात आम्ही गेलो होतो, गप्पा चालू झाल्या, तेव्हड्यात दोन अगदी लहान म्हणजे जेमतेम अठरा एकोणीस वर्षांच्या मुली आणी त्यांचे आई वडील शेजारच्या टेबलावर बसले. मुली नको नको म्हणत असताना आईने त्यांच्यापुढे ग्लास ठेवले. खरी गम्मत पुढे आहे, आई इतकी तर्र झाली होती कि मुलीं शरमेने बेजार झाल्या होत्या. हे असं काही बघितलं कि मला एकदम गडबडून जायला होतं, कधी रामाकाळी घेतला जाणारा वाईनचा ग्लास डोळ्यासमोर खळ्कन फुटतो. काहीसं भानावर आल्यासारखं होतं. सध्या तर मला सगळीकडे घाईच घाई दिसते आहे, लहानांना मोठं करण्याची घाई, मोठ्यांना आणखीन मोठं होण्याची घाई. सगळ्यांचीच पुढे जाण्याची घाई आणी जीवघेणी स्पर्धा. स्वस्थपणे शांत श्वास दुर्मिळ झाला आहे. दोष मात्र आपण बदललेल्या हवामानाला आणी अवाजवी जाहिरातबाजीला देतो. वास्तविक दोन्हीला आपणच जबाबदार आहोत. माझ्या पुरतं मी पूर्वीसारखं सिझनल व्हायचं ठरवलं आहे, तुम्ही काय ठरवलं आहे? आता थोड्यावेळात "हैप्पी गटारी" चे मेसेज यायला सुरुवात होईल मग?……… उद्या वेळेवर उठलात तर सांगा मग काय केलंत ते !

No comments:

Post a Comment